मुंबई:मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ झाल्याने महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या लागू असलेली २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. आता १० टक्के इतकीच पाणीकपात लागू राहणार आहे. दिनांक २१ ऑगस्टपासून हा बदल लागू होईल, असे पालिकेने नमूद केले आहे. दरम्यान, ऐन गणेशोत्सवात पाणीकपात कमी झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. ( 10 Percent water cut in Mumbai )
वाचा: पर्जन्य जलवाहिन्यांचा गुंता
काही दिवसांपूर्वी जलाशयांमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याच्या कारणाने मुंबई महानगरपालिकेने दिनांक ५ ऑगस्ट २०२० पासून मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये २० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र मागील काही दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलस्त्रोतांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे आज (दिनांक १९ ऑगस्ट २०२०) एकूण आवश्यक जलसाठ्याच्या ८५ टक्के इतका जलसाठा उपलब्ध झाला आहे. तुलना केल्यास, याचदिवशी ऑगस्ट २०१८ मध्ये ९१.८३ टक्के तर ऑगस्ट २०१९ मध्ये ९४.२८ टक्के इतका जलसाठा होता.
वाचा: मुंबईत करोनालढा तीव्र
मुंबईचा पाणीपुरवठा दिनांक ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीत ठेवण्यासाठी सध्याची २० टक्के पाणीकपात ही दिनांक २१ ऑगस्ट २०२० पासून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत आहे. ही पाणी कपात मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांनादेखील लागू राहणार आहे. सर्व नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा न्याय्य पद्धतीने वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
वाचा: अखेर ठरलं! पावसाळी अधिवेशनासाठी ७ सप्टेंबरचा नवा मुहूर्त
विहार, तुळशीनंतर मोडकसागर तलाव ओसंडून वाहू लागला
मुंबई शहरासाठी जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव काल मंगळवारी रात्री ९.२४ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. गतवर्षी हा तलाव २६ जुलै २०१९ रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी दिनांक १५ जुलै २०१८ रोजी ओसंडून वाहू लागला होता. यापूर्वी मुंबईतील विहार तलाव ५ ऑगस्ट तर तुळशी तलाव २७ जुलै रोजी ओसंडून वाहू लागले होते. त्यामुळे मुंबईची पाणीचिंता दूर होताना दिसत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास तानसा आणि भातसा ही धरणेही लवकरच तुडुंब भरण्याची आशा असून त्यासोबतच पाणीकपातही येत्या काळात दूर होईल अशी शक्यता आहे.
वाचा: उद्यापासून एसटी सुरू! ई पासशिवाय प्रवास करता येणार
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/10-percent-water-cut-in-mumbai-from-august-21-instead-of-20-per-cent/articleshow/77637647.cms