मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेसमोर मोठं आव्हान : क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितलेले १२०० प्रवाशांचा नाही थांगपत्ता – Loksatta

राज्यात करोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला. मात्र, सध्या करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. त्याचबरोबर मृत्यू झालेल्यांची संख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. असं चिंतेच वातावरण असताना एक धक्कादायक माहिती समोर आली. २२ मार्च रोजी परदेशातून मुंबईत परतलेल्या प्रवाशांना महापालिकेनं तयार केलेल्या खोल्यांमध्ये किंवा घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याची सूचना देण्यात आली होती. दरम्यान होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आलेल्या प्रवाशांपैकी १२०० प्रवासी सध्या कुठे आहेत, याचा पत्ताच महापालिकेला नाही. त्यांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. यामुळे मुंबई महापालिकेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आलेल्या दोन हजार २०० प्रवाशांना त्यांच्या घरच्यांपासून त्याचबरोबर शेजाऱ्यांपासून होम क्वारंटाइन राहण्याची सूचना देण्यात आली होती. होम क्वारंटाइन किंवा महापालिकेच्या खोल्यांमध्ये क्वारंटाइन राहण्याचंही सांगितलं होतं. मात्र, होम क्वारंटाइन राहण्यास सांगितलं होतं. यात होम क्वारंटाइनमध्ये राहण्याची सूचना दिलेल्या प्रवाशांपैकी १२०० प्रवासी कुठे आहेत? याचा शोध महापालिकेचा लागत नाही. त्यांनी फॉर्मवर दिलेला मोबाईल नंबर लागत नसल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ‘इंडियन ए्क्स्प्रेस’नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार मुंबई महापालिकेनं १६ मार्च रोजीच २४ डॉक्टरांचं पथक तयार केलं. एका पथकात आठ डॉक्टरांचा समावेश आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचं काम या पथकाचं होतं. तपासणीनंतर प्रवाशांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात येत होती. यात ज्यांना करोनासदृश्य लक्षणं होती अशा अ आणि ज्यांना लक्षणं नव्हती पण, करोना होण्याची शक्यता आहे अशा ब गटातील प्रवाशांना महापालिकेच्या क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आलं. त्यासाठी महापालिकेनं काही खोल्या तयार केलेल्या आहेत. तर हॉटेल्स आणि लॉजच्या खोल्याही आरक्षित केल्या आहेत.

मात्र, यातील काही प्रवाशांनी होम क्वारंटाइनमध्ये राहणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला होता. हे प्रवासी मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध भागातील रहिवाशी आहेता. दरम्यान, महापालिकेनं त्यांचा पाठपुरावा सुरू केला असता, महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. तब्बल १२०० प्रवाशांशी संपर्क होत नसल्याचं समोर आलं. तर सात जणांना करोनासदृश्य लक्षणं दिसून आल्यानं कस्तुरबा रुग्णालयात दाखल होण्यास सांगण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे विमानतळावर दिलेल्या माहितीत या प्रवाशांनी दिलेले मोबाईल नंबर बंद येत आहेत. तर काहीजण उत्तरच देत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे आता १२०० जणांचा शोध घेण्याचं आव्हान महापालिकेसमोर आहे उभं ठाकलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on March 29, 2020 9:27 pm

Web Title: coronavirus in india 1200 travellers asked to self quarantine in mumbai cant be traced bmh 90

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-in-india-1200-travellers-asked-to-self-quarantine-in-mumbai-cant-be-traced-bmh-90-2119120/